जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा   

तृणमूल काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तृणमूल काँग्रेसने बुधवारी केली. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवशेन बोलाविण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीतही करण्यात आली होती.
 
तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील उपनेत्या सागरिका घोष पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान तृणमूल काँग्रेस सरकारच्या पाठीशी उभा राहिला. परदेशात पाठविलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांनाही तृणमूलने पाठिंबा दिला. खासदार कपिल सिब्बल यांनी सर्वप्रथम संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली होती. त्यास आम्ही पाठिंबा देत आहोत, असे घोष म्हणाल्या. सर्वच पक्षांकडून विशेष अधिवेशनाची मागणी केली जात आहे, असे राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे संसदीय नेते डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले.
 
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवीत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरही, पाकिस्तानची खुमखुमी कायम होती. मात्र, भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाकिस्तान नमला. पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा जागतिक मंचावर फाडण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशात पाठविली आहेत. ही शिष्टमंडळे ३२ देशांना भेट देणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे संयुक्त जनता दलाचे संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग आहेत.

Related Articles